
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावर नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. याचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असून, लोकांना दररोज दोन ते अडीच तास वाहतूककोंडीत घालवावे लागत आहेत. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूककोंडी तत्काळ सोडवण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.
माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्यात येतील, असे सांगितले आहे. कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याण फाटा ते पत्रीपूल, तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाय-जंक्शन ते कल्याण फाटापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. याचा प्रवाशांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
कल्याण-शिळ महामार्गावरून नवी मुंबई औद्योगिक वसाहतीकडे तसेच मुंबईकडे नोकरी-व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग ये-जा करत असतो. दररोज दोन ते अडीच तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे व्यापार व व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
तातडीच्या उपाययोजनांची मागणी
कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याण फाटा ते पत्रीपूल, तसेच महापे रस्ता आणि वाय-जंक्शन ते कल्याण फाटापर्यंतची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.