
कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी गुरूत्व वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात १८ ते १९ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी गुरूत्व जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना १८ सप्टेंबर गुरूवारी रात्री १२ वाजता ते १९ सप्टेंबर शुक्रवारी रात्री १२ वाजता पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापत्य अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारवी धरणातून येणारे पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसीकडून उचलले जाते. हे कच्चे पाणी जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिन्यांद्वारे बदलापूर, अंबरनाथ निवासी व औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरास दररोज वितरित केले जाते.