
भाईंंदर : काशिमीरा परिसरातील हॉटेलमधून एका गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल चौधरी व विशाल चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील सुरतचे रहिवासी रोहित तेलपुरीया हे भाईंदरच्या सोना लॉजिंगमध्ये थांबले असताना त्यांचा ओळखीचा विशाल चौधरी पाच अनोळखी व्यक्तींना घेऊन त्यांच्या खोलीत आला. ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून त्यांनी रोहित यांचे अपहरण केले. नंतर डोळ्याला पट्टी बांधून हायवेवर नेले गेले आणि त्यांच्या पत्नीशी फोनवर संपर्क करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली. पत्नीने जवळचे दागिने दिले तर रोहित यांच्याकडील १.२ लाख रुपये रोख व १८ हजारांचे घड्याळ काढून घेतले गेले. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.