

मुंबई : निवडणुकीच्या महापालिका निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय आणि सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या आहेत. येथील महानगरपालिकेत मोठा घोडेबाजार होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे केली. तसेच, केडीएमसी महापालिकेत शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षात बसेल, अशी माहिती आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली.
विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय आम्हाला मान्य...
यावेळी विरोधी बाकावर निर्णय आपल्याला मान्य असल्याचे बसण्याचा पक्षाचा नगरसेवकांनी स्पष्ट केले. आम्ही ही संपूर्ण निवडणूक शिंदेसेना आणि भाजपा विरोधात लढलो. आमचे नगरसेवक ५ ते ६ हजारांच्या फरकांनी निवडून आले आहेत. त्यामुळे, या दोन्ही पक्षांसोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही बसणार अहोत. कल्याण -डोंबिवलीमध्ये आम्ही विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या बैठकीनंतर वरुण सरदेसाई यांनी दिली.
तरच 'त्या' ४ नगरसेवकांवर कारवाई
मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. शिवसेना ठाकरे पक्षाचे जे ४ नगरसेवक आमच्यासोबत होते त्यांनी अजून नोंदणी केलेली नाही. मात्र पुन्हा बैठक घेऊ आणि जर ते आले नाहीत तर कारवाई करू. कारण, त्यांनी आमच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मग पुढील ५ वर्षांत तुम्ही मतदारांना कसे सामोरे जाणार आहात ?, असा सवालही सरदेसाई यांनी नॉट रिचेबल नगरसेवकांना विचारला आहे.
महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले. तसेच भाजप महायुतीने वर्चस्व मिळवले असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक ५३ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी नगरसेवकांची गरज आहे. त्यातच, मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर, ठाकरेंचेही ४ नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.