
शहापूर : मुंबई - नाशिक महामार्गचे चौपादरीकरण झाल्यापासून चर्चेत असलेला खातीवली - वाशिंद चौफुलीवरील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला खातीवली, वाशिंद गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल आठ वर्षांनी सुरुवात झाली आहे. महामार्ग प्रशासनाने खातीवली येथील चौफुलीवर उड्डाणपुलाचे काम सुरू केल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
खातीवली येथील शुभवस्तू गृहसंकुल येथील महामार्ग चौफुलीवरील महत्त्वपूर्ण असलेला उड्डाणपूल सोडून इतर सर्व कामे मागील वर्षी सुरू झाली होती. मात्र महामार्ग प्रशासन व कंत्राटदाराकडून खातीवली उड्डाणपुलाबाबत निरुत्साही धोरण असल्याने खातीवलीचे माजी उपसरपंच साईप्रसाद काबाडी, ग्रामस्थ प्रशांत महाजन, एकनाथ तारमले, वाशिंद येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सुरळके यांनी अनेक वर्षांपासून महामार्ग प्रशासनासोबत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. आंदोलन, उपोषण, पत्र व्यवहार याद्वारे सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. महामार्ग प्रशासनाने खातीवली-वाशिंद येथील चौफुलीवर उड्डाणपूल बांधण्याचा शुभारंभ केला आहे. हे काम वेळेत काम पूर्ण झाले तर महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल.