
सुमित घरत / भिवंडी
भिवंडी शहराच्या लगत असलेले ठाण्याप्रमाणे भिवंडी देखील तलावाचे शहर होते. पण स्थानिक नागरिकांच्या दुर्लक्षाने शहरातील अनेक तलावांचे अस्तित्व गायब झाले. त्यातच भिवंडीकर नागरिकांनी विविध स्वप्ने दाखवीत विकासाच्या नावाखाली त्यावर बांधकामे केली. त्यामुळे सध्या शहरातील तलावांचे अस्तित्व केवळ पोस्टाच्या व घरगुती पत्त्यापुरता राहिले असून भिवंडीकरांना आता पाण्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणा भटकंती करावी लागत आहे.
एकेकाळी भिवंडीत असलेल्या मोठमोठ्या तलाव, पाण्याचे हौद आणि विहिरींमुळे मुबलक पाणी मिळत होते. मुबलक पाण्यामुळे भिवंडीकरांना कधी पाण्यासाठी वणवण फिरावे लागत नव्हते की नळातून येणाऱ्या पाण्याची वाट पाहावी लागत नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी भिवंडीतील तरुणांनी भिवंडीकरांसाठी वऱ्हाळादेवी तलावाचे पाणी नळ्यांच्या कौलांद्वारे शहरातील ब्राह्मण आळीतील भीमेश्वर मंदिराजवळील हौदात आणून सोडले होते. हे पाणी वऱ्हाळा तलावातून सोडण्यासाठी आणि हौद भरण्यासाठी वेळ ठरलेली होती.भविष्यात जुन्या भिवंडीसाठी याच वऱ्हाळा तलावातून प्रथम भिवंडी नगरपरिषदेद्वारा लोखंडी पाइपलाईन टाकून नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पाणी पुरविण्यात आले. त्यापूर्वी परिसरातील नागरिक आंघोळीसाठी तलावात अथवा विहिरीवर गर्दी करीत होते. तर महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करीत होते. पण घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा होऊ लागला. तेव्हापासून शहरातील तलाव, हौद आणि विहिरींकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले, त्याचा परिणाम आज भिवंडीकरांना विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.
भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय वाढीस लागल्यानंतर लोकवस्तीत वाढ झाली. सरकारी जागेवर अवैध लोकवस्ती वाढत असताना काही ठिकाणी नागरिकांनी तलावामध्ये मातीचा भराव टाकून राहण्यासाठी बेकायदेशीर घरे बांधली. तलावांचे शहर असलेल्या भिवंडीतून हळूहळू तलाव नाहीसे झाले आहेत. आता तलावांचे नाव केवळ सरकारी कागदांवर पत्त्यासाठी आणि घरगुती पत्त्यासाठी वापरले जाते. महापालिकेने बहुतांश तलावांवर शाळा, सोशल हॉल, स्टेडियम बांधले आहेत. परंतु शहरात असे अनेक तलाव आहेत, ज्यांवर स्थानिक लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. गौरीपाडा परिसरात सुमारे पाच एकरांवर पसरलेल्या प्रसिद्ध धोबी तलावावर पालिकेने परशुराम टावरे स्टेडियम बांधण्यात आले आहे. मोठी स्वप्ने दाखवून बांधलेल्या या स्टेडियममध्ये ना क्रीडा सुविधा आहेत ना सुरक्षा व्यवस्था आहेत. तसेच सुमारे दहा एकरांवर पसरलेल्या घुंघटनगर येथील काप तलावावर स्थानिक लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. तीच अवस्था नागाव परिसरातील किडवाईनगर येथील किडवाई तलावाची आहे. येथेही लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून झोपड्या, इमारती, यंत्रमाग शेड बांधले आहेत. तसेच मदारछल्ला येथील नारळी तलावावर आणि निजामपुरा येथील तलावावर महापालिकेची प्राथमिक शाळा बांधण्यात आली. ठाणगे आळी येथील कोंडवाडा तलावावर मीनाताई ठाकरे रंगायतन हे नाट्यगृह बांधण्यात आले, ते काही वर्षांपासून बंद आहे. अशा प्रकारे शहरातील तलाव गायब झाले तरी हे तलाव नागरिकांच्या पत्त्यावर आणि सरकारी कागदांवर हे तलाव जिवंत आहेत. सध्या भिवंडीत वऱ्हाळा तलाव हा मोठा तलाव आणि दिवाणशहा येथील नसरुल्ला तलाव, भादवड तलाव, नारपोली तलाव असे छोटे तलाव उरले आहेत. या तलावांचे सुशोभीकरण करून त्यांचे मूळ अस्तित्व जपणे तसेच ज्या तलावावर पालिकेने विकास कामे केली आहेत, त्याचा हेतू साध्य करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केले पाहिजेत.
भिवंडी शहराचा प्रसिद्ध असलेल्या वऱ्हाळा तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी विकास आराखडा तयार केला असून सुशोभीकरणाच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. तर भादवड तलावातील गाळ काढून त्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. शहरातील सर्व तलावांकडे पालिकेचे लक्ष्य असून नागरिकांच्या मागणीनुसार तलावात सुधारणा केल्या जात आहेत.
- संदीप पाटनावर, भिवंडी महापालिका, मुख्य अभियंता