दिवंगत आनंद दिघे यांचे स्मारक अद्याप कागदावरच; सत्ताधाऱ्यांना विसर; पालिकेच्या अर्थसंकल्पात केवळ घोषणा

केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आजही आवर्जून घेतले जाते, ते शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक अद्याप कागदावरच आहे.
दिवंगत आनंद दिघे
दिवंगत आनंद दिघेसोशल मीडिया
Published on

अतुल जाधव/ठाणे

केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आजही आवर्जून घेतले जाते, ते शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक अद्याप कागदावरच आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेच्या दोन अर्थसंकल्पात या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी ५ कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र या स्मारकाच्या संदर्भात प्रशासकीय पातळीवर एवढ्या वर्षात काहीच हालचाली झाल्या नसून दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना या घोषणेचा विसर पडला आहे की काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्याचे राजकारण हे शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमख आनंद दिघे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आनंद दिघे हे जाऊन आता जवळपास ३३ वर्ष उलटून गेल्यानंतरही आजही ठाणे आणि किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. पालिकेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा उल्लेख आजच्या राजकीय मंडळींकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. सत्ताधाऱ्यांचे राजकारण तर आनंद दिघे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मात्र आज त्याच आनंद दिघे यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या स्मारकासाठी पालिका स्तरावर साधी बैठकही घेण्यात आली नाही. महापालिका प्रशासनाकडून अद्याप प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. परिणामी हा निधी केवळ पडूनच असून यावर निर्णय न झाल्यास हा निधी २०२५ -२६ च्या अर्थसंकल्पात फेरसादर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून आनंद दिघे यांचे नाव घेतले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in