

ठाणे/भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या (महाटेट) प्रश्नपत्रिका आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमधून अवघ्या ८,००० रुपयांच्या लाचेसाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या बुटांच्या इनसोलमध्ये (तळव्यात) लपवून बाहेर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी भिवंडी येथील स्थानिक न्यायालयात ३,५०० पानांचे दोषारोपपत्र (आरोपपत्र) दाखल केले आहे.
या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह १८ आरोपींची नावे समाविष्ट असून, त्यापैकी १६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर अशोक साव आणि प्रकाश मिसळ हे दोन मुख्य साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
२८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेच्या अवघा एक दिवस आधी या रॅकेटचा पर्दाफाश झाला. भिवंडीतील एका रहिवाशाला परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीतील कोणगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेऊन प्रश्नपत्रिकांचे ४ संच जप्त केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली असता हे संच मूळ प्रश्नपत्रिकांशी तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले.
बुटांतून चोरी
तपासादरम्यान या फुटीचे मूळ आग्रा येथील 'माहिम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड' या गोपनीय छपाईचे कंत्राट मिळालेल्या प्रिंटिंग प्रेसपर्यंत पोहोचले. १५ ते १७ जून दरम्यान प्रेसचे दोन कर्मचारी आणि एका माजी कर्मचाऱ्याने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून प्रश्नपत्रिकांच्या घड्या घालून त्या आपल्या बूटांच्या इनसोलमध्ये लपवल्या. सुरक्षा रक्षक कपड्यांची अंगझडती घेत असत, परंतु त्यांनी पायातील बूटांकडे दुर्लक्ष केले. या चोरीसाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ८,००० आणि आग्र्यामध्ये भूखंड देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. परीक्षेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी राज्य सरकारने २ पेपर्सचे ४ वेगवेगळे संच तयार केले होते, मात्र आरोपींनी चारही संच चोरून बाहेर काढले.
सूत्रधाराचे धागेदोरे
या आंतरराज्यीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता हा माजी कोचिंग क्लास शिक्षक असून, यापूर्वी ओडिसातील एका परीक्षा पेपरफुटी प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुप्ता याच्या बिहारमधील नातेवाईकाच्या घरातून मूळ प्रश्नपत्रिका हस्तगत केली असून, हा या प्रकरणातील महत्त्वाचा भौतिक पुरावा ठरला आहे.
पूरक आरोपपत्र
या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या कलमांसह महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत असून, पुढील तपासाअंती न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल केले जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.