महायुतीची घोषणा आणि कलानी गट अस्वस्थ! उल्हासनगरातील राजकीय गणिते बदलली

नागपूर अधिवेशनात भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीवर शिक्कामोर्तब होताच उल्हासनगरमधील अनेक राजकीय गणिते कोलमडली असून, महायुतीची ही घोषणा टीम ओमी कलानी (टीओके)साठी मोठा धक्का मानली जात आहे. भाजपशी राजकीय संघर्ष करून आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत असलेल्या कलानींना आता या युतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महायुतीची घोषणा आणि कलानी गट अस्वस्थ! उल्हासनगरातील राजकीय गणिते बदलली
महायुतीची घोषणा आणि कलानी गट अस्वस्थ! उल्हासनगरातील राजकीय गणिते बदललीछायाचित्र : फेसबूक
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर मनपा निवडणुकीआधीच शहराच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. नागपूर अधिवेशनात भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीवर शिक्कामोर्तब होताच उल्हासनगरमधील अनेक राजकीय गणिते कोलमडली असून, काहींसाठी हा सत्तेचा सोपा मार्ग ठरत आहे, तर काहींसाठी ही युती थेट अस्तित्वाची लढाई बनली आहे. महायुतीच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय वर्तुळ अक्षरशः तापले असून, आगामी निवडणूक आता केवळ सत्ता नाही तर वर्चस्वासाठीची निर्णायक लढाई ठरणार आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना महायुती कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. नागपूर येथे पार पडलेल्या भाजप-शिवसेना अधिवेशनात दोन्ही पक्षांनी आगामी मनपा निवडणुका एकत्र लढवण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे पडसाद उल्हासनगरच्या राजकारणात उमटले असून, अनेक राजकीय गटांची अस्वस्थता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, नागपूर अधिवेशनात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट आदेश दिला असून, उल्हासनगर महापालिका निवडणूक भाजप व शिवसेना महायुतीतूनच लढवली जाईल. या निर्णयानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे वधारियांनी सांगितले असून, लवकरच महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत जागावाटप, उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे.

दरम्यान, महायुतीची ही घोषणा टीम ओमी कलानी (टीओके)साठी मोठा धक्का मानली जात आहे. भाजपशी राजकीय संघर्ष करून आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत असलेल्या कलानींना आता या युतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आपले राजकीय वर्चस्व आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आणि युतीत फूट पाडण्यासाठी कलानी यांनी थेट ठाण्यातील शिंदे दरबारात धाव घेतल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. भाजपसोबत युती करू नये, यासाठी त्यांनी आग्रह धरल्याचेही बोलले जात आहे.

भाजप सोडून कलानी गटात गेलेल्या अनेक नेत्यांनाही आता बदलत्या राजकीय समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता आहे. महायुती प्रत्यक्षात आली तर जागा वाटपावरून भाजप, शिवसेना, टीओके आणि साई पक्ष यांच्यात तीव्र संघर्ष होणे अटळ मानले जात आहे. अनेक प्रभागांमध्ये महायुतीमुळे टीओके आणि साई पक्षाला माघार घ्यावी लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in