

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत महायुतीतील दरी पुन्हा एकदा उघड झाली असून उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मित्रपक्षावर जोरदार हल्लाबोल केला. युती धर्म आम्ही पाळतो, पण सभागृहात विषय मंजूर करताना नियम, प्रक्रिया आणि सभा शास्त्राची उघडपणे पायमल्ली केली जात आहे, असा थेट आरोप त्यांनी करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
गेल्या चार महासभांमध्ये चर्चा न करता कोट्यवधी रुपयांचे विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत पाटील म्हणाले की, भाजपची इच्छा नसतानाही पक्षादेश म्हणून आम्ही युतीत निवडणूक लढलो. ठाणेकरांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी केले. मात्र आता सभागृहात चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करून लोकशाहीची थट्टा केली जात असून याला जबाबदारी शिंदे सेनाच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फेब्रुवारीत इतिवृत्ताला विरोध केला असतांना पुन्हा तोच विषय नुकत्याच झालेल्या महासभेत चर्चेविना मंजुर करण्यात आला. महासभेत कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही. मी नियमानुसार कामकाज केले असून मलासुद्धा सभाशास्त्र समजते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सभागृहात सदस्यांना बोलू दिले जात नाही. राष्ट्रगीताचाही अवमान झाला, असा संताप त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या महासभेत ४३२ कोटी रुपयांचे विषय चर्चा न करताच मंजूर केल्याचा आरोप करत त्यांनी अनेक निर्णयांवर सवाल उपस्थित केले. खंडू रांगणेकर बॅटमिंटन कोर्टचा विषय ७२ ब मधून आणला, नंतर तोच विषय पुन्हा ३५ अ अंतर्गत आणण्यात आला. एकच विषय दोनदा मंजूर केला जात असून यातून ५५ कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
बॅडमिंटन कोर्टावरील खर्च, महिलांसाठीच्या देण्यात येणारी वास्तू आणि संस्थांच्या नावाखाली होणाऱ्या खर्चावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सभागृह सभा शास्त्रानुसार चालले पाहिजे. अन्यथा विरोध होणारच, असा इशाराही त्यांनी दिला.