वसई : सर्वांना सक्तीच शालेय शिक्षण मिळावे यासाठी आरटीई योजनेंतर्गतची राईट टू एज्युकेशन (RTE) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल नारायण ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरची ऑनलाईन प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सुरू होते. परंतु यंदा फेब्रुवारी महिना उजाडला तरी सुद्धा अद्याप आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यातच राज्यशासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सुमार दर्जाचे शिक्षण सोयीसुविधांचा अभाव यामुळे दुर्गम, ग्रामीण, अनुसूचित जाती जमाती तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पालक व विद्यार्थ्यात संभर्म व चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकरिता ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.