

ठाणे : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. श्री मामा बालनिकेतन ते आनंदनगर-मुलुंड चेकनाका परिसरातील खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. खड्डे न बुजवल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेचे पदाधिकारी रवी मोरे यांनी दिला.
खड्ड्यांमुळे एका मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच मनसे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत रस्त्याची दुरवस्था समोर आली.
तातडीने रस्ते दुरुस्त करा!
पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. वेळेत कारवाई न झाल्यास मनसेकडून आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.