
मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबातील व्यक्तीला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाने केली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्यांबाबत खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या.
राज्य सरकारने लोकल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंतची मदत आणि उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. मात्र सरकारने केवळ आर्थिक मदत करण्यापेक्षा मृत प्रवाशांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली.
दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहिती देण्याचे रेल्वेचे आवाहन
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकलमधून ८ प्रवाशांचा तोल जाऊन ते चालू गाडीतून खाली पडले. या घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे.