उल्हासनगर महापालिका शहरातील दिव्यांग व गतिमंद बांधवाना दर वर्षी त्यांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणुन अनुदान देते. परंतु २०२१ ते २०२२ या कालावधीतील नविन अर्जदारांना अद्याप अनुदान मिळालेलेच नाही. दिव्यांग व गतिमंद बांधवांवर होणाऱ्या या अन्यायकारक वागणूकीबाबत मनपा प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून अनुदान त्वरीत देण्याची मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.
उल्हासनगर शहरात राहणाऱ्या दिव्यांग व गतिमंद बांधवाना शासनाच्या आदेशाप्रमाणे उल्हासनगर महापालिका उदरनिर्वाहासाठी अनुदान देते. मात्र कोविडच्या प्रादुर्भावाने हे अनुदान मिळण्यास उशीर झाला. आता कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तेव्हा २०२१ ते २०२२ या वर्षात ५०० दिव्यांग बांधवानी अनुदानासाठी नवीन अर्ज भरले होते,त्यापैकी काही रद्द झाले व काहीं मंजुर झाले. अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा मुळे अद्याप हे अनुदान मिळालेले नाही असा आरोप सविता तोरणे यांनी या लेखी निवेदनात केला आहे.
मनपाच्या लेखा विभागातील अधिकारी याबाबत उदासीनता दिसत असून विचारणा केल्यावर उडवा उडवीची उत्तरे देतात. दिव्यांग वारंवार फेऱ्या मारतात मात्र अनुदान किंवा ठोस महिती देखील मिळत नाही. दिव्यांग व गतिमंद बांधवाना ताबडतोब त्यांचे अनुदान देण्यात यावे तसेच जे अधिकारी यात दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी देखील मागणी केली. यावर जर ठोस निर्णय घेऊन लवकरात लवकर जर अनुदान नाही मिळाले तर या विरुद्ध आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी प्रवक्ता शिवाजी रगडे यांनी दिली.