मुरबाड : महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार विविध यंत्रणा सक्षम करत असल्याचा दावा केला जात असताना, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतिगृहात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव कोमल भास्कर खाकर (रा. डोगरवाडी) असे असून, तिचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सदर घटना मोरोशी येथील मुलींच्या वसतिगृहात घडल्याने ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. कोमलने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून, सखोल चौकशीनंतरच संपूर्ण सत्य उजेडात येईल, असे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, याच आश्रमशाळेत यापूर्वीही दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, अशा गंभीर घटना रोखण्यात शिक्षण विभाग पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मोरोशी वसतिगृह आश्रमशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, असल्यास संबंधित सर्व फुटेज तपासण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. शाळेत वसतिगृह असूनही मुलींना पुरेसे संरक्षण मिळत नसेल, तर पालकांनी आपल्या मुलींना शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांच्या भरवशावर कसे सोपवायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात संबंधित शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्य यांच्या दुर्लक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, या घटनेची मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेऊन शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य व इतर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती गठित करावी, दोषींवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आश्रमशाळेत एकूण ४०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी सुमारे १०० विद्यार्थी वसतिगृहात राहतात. यामध्ये ७३ मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्याध्यापक निलंबित
मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी कोमल भास्कर खाकरच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्याने माध्यमिक मुख्याध्यापक प्रल्हाद रामराव भोई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशी अहवालानुसार, विद्यार्थिनीच्या मासिक पाळीच्या नोंदीत अनियमितता आढळून आली असून, अशा स्थितीत तत्काळ आरोग्य तपासणी आवश्यक असतानाही ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुख्याध्यापकांनी वसतिगृहाच्या देखरेखीबाबत आवश्यक दक्षता न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही मुख्याध्यापक २४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंतच शाळेत उपस्थित होते, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.