स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा योजने अंतर्गत उल्हासनगर महापालिकेने उल्हासनगर शहरात 60 हजार तिरंगे फडकविण्याचे लक्ष्य असल्याचे पालिका आयुक्त अजीज शेख यांनी जाहीर केले. तसेच कॉर्पोरेट कंपनीच्या सामाजिक बांधलकीच्या निधीतून तिरंगे खरेदी करून मालमत्ताधारकाना उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
यंदा 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे या अभियानाची माहिती देण्यासाठी पालिका आयुक्त अजीज शेख यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, शहर अभियंता प्रशांत सोळंकी, उपायुक्त अशोक नाईकवडे, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, श्रद्धा सपकाळे, दत्तात्रय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माझ्या तिरंगाबरोबर माझी सेल्फी, सेल्फी पॉइंट, ध्वज संहितेची माहिती देणारा व्हिडिओ, इंस्टाग्रामवर रिलची स्पर्धा अश्या विविध योजना राबवून हर घर तिरंगा ही योजना सफल करण्याची मागणी पत्रकारांनी यावेळी केली. तसेच प्रभाग समिती कार्यालय, पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र मधून तिरंगा वाटप किंवा विक्री केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली