लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पाळणार युतीधर्म

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बुधवारी बदलापूरजवळील आंबेशिव येथे पार पडली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पाळणार युतीधर्म

बदलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माध्यमातून बदलापुरातून सुमारे ५० हजार मते महायुतीच्या उमेदवाराला देऊ, असे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस युतीधर्माचे पालन करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी दिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बुधवारी बदलापूरजवळील आंबेशिव येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी हे संकेत दिले. पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना शहरात पक्ष बांधणी, लोकोपयोगी उपक्रम-कार्यक्रम राबवणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचून शहरात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कॅप्टन आशिष दामले यांनी केले. या मेळाव्याला तरुण, ज्येष्ठ तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याबद्दल दामले यांनी समाधान व्यक्त केले.

लोकसभेला राष्ट्रवादीकडून ५० हजार मते

बदलापूर शहरात प्रत्येक भागात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्रिय असून नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे नागरिकही शहरात मोठ्या संख्येने आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अशी ५० हजार मते महायुतीच्या उमेदवाराला मिळतील, असा दावा दामले यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in