पाणी पुरवठा विभागाला सक्षम करण्याची आवश्यकता

पाणी पुरवठा विभागाला सक्षम करण्याची आवश्यकता

ठाणे महापालिकेकडे स्वतःचे जलायश नसल्यामुळे सध्या मुंबई महापालिका, स्टेम, एमआयडीसी आणि स्वतःच्या पाणी योजनेतून शहरात पाणी वितरणाची कसरत सुरु आहे. मात्र एकाचवेळी चार यंत्रणांकडून पाणी उचलताना आणि त्याचे शहरात वितरण करताना पाणीपुरवठा विभागाची दमशाक होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणांकडून विविध कामाच्या निमित्ताने पाणीपुरवठा बऱ्याचदा बंद ठेवावा लागतो त्यावेळी मोठी अडचण निर्माण होत असल्याने चार यंत्रणांकडून नको तर एकाच सक्षम यंत्रणेकडून किमान ४०० द.ल.लि. पाणी उचलण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

पाणी पुरवठा विभागाला सक्षम करण्याची आवश्यकता असून जुन्या पाईपलाईन बदलण्याची आणि पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ठिकठिकाणी नव्या यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या जलकुंभातून असलेल्या पाणीपुरवठ्या व्यतिरिक्त प्रतिदिन १२ द.ल.लि प्रतिदिन इतका पाणीपुरवठा नुकताच सुरु करण्यात आला आहे. तसेच १५ ल. ल. ली. क्षमतेच्या पंपमधून १०० अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे पाणी उचलण्यात येत आहे. सुमारे २९ कि.मी लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने महापालिका कार्यक्षेत्रातील इतर विभागातही पाणीपुरवठा मुबलक होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे कळवा- मुंब्रा- दिवा भागात ४० वर्ष जुनी झालेली पाण्याची मुख्य पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे.

शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आवश्यक असणाऱ्या वाढीव पाण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून पिसे येथील पम्पिंग स्टेशन मध्ये वाढीव क्षमतेचे पंप बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ६०० अश्वशक्तीचे पंप बदलून ११५० अश्वशक्तीचे ५ पंप बसवण्यात येत आहेत. त्यामुळे शहरास अतिरिक्त १०० द ल लि प्रतिदिन पाणी पुरवठ्यात वाढ होणार आहे. दुसरीकडे घोडबंदर रोड आणि परिसरात रिमॉडेलिंग योजनेअंतगर्त नवीन वाहिनी टाकणे, ३ जलकुंभ, २ संप पंप हाऊस व वितरण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच दिवा-मुंब्रा येथे रिमॉडेलिंगचे काम सुरु आहे. यात नवीन वाहिनी टाकणे उर्वरित विभागासाठी रिमॉडेलिंग अंतर्गत काम करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

चार यंत्रणांकडून पाण्याची उचल करण्यापेक्षा मुंबई महापालिकेच्या भातसा धरणातून किमान ४०० द ल ली पाण्याची उचल करण्यात यावी. विशेष म्हणजे कच्चे पाणी उचलण्यात यावे आणि पिसे तसेच टेमघर येथे स्वतःची उपलब्ध असलेली यंत्रणा तसेच जादा शक्तीची नवी यंत्रणा उभारून पाण्याचे शुद्धीकरण करणे शक्य असल्याने कमी दरात पाणी मिळवून ते ठाणेकरांना वितरित करणे शक्य होऊ शकते. याबाबतचा एक अहवाल पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून तो लवकरच पालिका आयुक्तांकडे दिला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in