नवीन शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित

केडीएमसी परिसरात कल्याणमधील एक आणि डोंबिवलीतील दोन अशा तीन रेशनिंग कार्यालये आहेत.
नवीन शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित

कल्याण : रेशनिंग विभागातील ऑनलाईन संबंधित प्रणालीशी जोडणी बंद असल्यामुळे नवीन शिधापत्रिकाधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. जुन्या कार्डधारकांना याचा लाभ मिळत असला, तरी नवीन शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन जोडणी नसल्याने त्यांना रेशन दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत नवीन शिधापत्रिकाधारकांना शासकीय योजनांचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जुन्या कार्डधारकांना ही सुविधा मिळत असल्याचे रेशनिंग विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ज्या कार्डधारकांना नवीन शिधापत्रिका मिळत आहेत त्यांनाच ऑनलाईन लिंकची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील हजारो लाभार्थी अन्नधान्य मिळण्यापासून वंचित आहेत.

केडीएमसी परिसरात कल्याणमधील एक आणि डोंबिवलीतील दोन अशा तीन रेशनिंग कार्यालये आहेत. डोंबिवली ३९-एफ (उप) कार्यालयाबद्दल बोलायचे झाल्यास येथे पीएचएचच्या ३८ हजार ४६ शिधापत्रिका आहेत. लोकसंख्या १ लाख ३८ हजार १४० आहे. प्रति व्यक्ती ५ किलो रेशन मिळते. तसेच अंत्योदयच्या ८७१ शिधापत्रिका असून, त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे; मात्र डोंबिवली, कल्याण आदी भागात हजारो नवीन कार्डधारक आहेत, ज्यांचे रेशनकार्ड लिंक झालेले नाही. त्यामुळे लोक लाभापासून वंचित राहतात. कल्याण ३८ फ विभागात एकंदरीत १६८ रेशनिंग दुकाने अस्तित्वात आहेत यामध्ये केसरी रेशनधारकांची संख्या एक लाख तीस हजार ५५४ इतकी आहे. तसेच यामध्ये अंत्योदय योजनेंतर्गत एक हजार ८० इतके शिधापत्रिका धारक असून यात प्रामुख्याने तांदूळ आणि गव्हाचे वाटप केले जाते. तसेच या ठिकाणी दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांची संख्या हजारच्या वरती असल्याचे सांगितले गेले आहे.

दरम्यान, कल्याण परिसरातील दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबीयांच्या महिलेला शासनाकडून साडी वाटपाचे धोरण असून, शासनाने कल्याण शिधावाटप कार्यालयाकडे सुमारे एक हजारहून अधिक संख्येने या साड्या येथे दिल्या गेल्या आहेत. साड्यांचा मोठा ढीग कल्याण कार्यालयात वाटप न केल्याने पडून आहेत. या साड्या नेमक्या केव्हा वाटप करणार? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

या संदर्भात कल्याणचे शिधावाटप अधिकारी दत्तात्रय नांगरे यांना विचारणा केली असता ज्यांचे शिधापत्रिका ऑनलाईन लिंक झाली नसेल, अशा नागरिकांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती त्यांनी दिली.

शिधापत्रिका ऑनलाईन लिंक होत नसल्याच्या सबबी

गेल्या काही महिन्यांपासून नवीन शिधापत्रिका काढणाऱ्यांची संख्या हजारोंच्या वर गेली असून, त्यांना मात्र शिधावाटप दुकानदार शिधापत्रिका ऑनलाईन लिंक होत नसल्याचे कारण देत हेलपाट्या मारण्यास भाग पाडत आहेत. शिधापत्रिका असतानाही केवळ ऑनलाईन लिंक होत नसल्याच्या सबबीखाली गेल्या काही महिन्यांपासून शासनाचे अन्नधान्य त्यांना मिळत नसल्याचे समोर येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in