डोंबिवली ( शंकर जाधव ) गुरुचरण जागेवरील डोंबिवलीतील सुमारे ३० हजार घरांना शासनाने नोटीसा बजावल्याने दीड लाख नागरिक बेघर होणार होते. नोटीस आल्याने नागरिक घाबरल्याने आपला संसार उघडल्यावर पडणार या भीतीने नागरिकांनी माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली. म्हात्रे यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला. यासंदर्भात नुकतेच पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या घरांवर हातोडा पडणार नसून नागरिकांना बेघर करणार नाही असा निर्णय घेतला. शिंदे सरकारने आपली घरे वाचविल्याने नागरिकांनी सरकारचे आभार मानले.
शासनाने ज्या ज्या घरांना नोटीसा बजावल्या होत्या, त्या रहिवाश्यांची डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील श्री गुरुदत्त नवनाथ मंदिरात `बाळासाहेबांची शिवसेना`पदाधिकारी तथा माजी नगसेवक दिपेश म्हात्रे यांनी बैठक घेतली. यात बैठकित माजी नगरसेवक म्हात्रे यांनी शिंदे सरकारने आपली घरे वाचविली असून हे सरकार जनतेचे सरकार असून पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या घरांवर हातोडा पडणार नसून नागरिकांना बेघर करणार नाही असा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपली घरे वाचणार हे एकूण उपस्थित महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तर उपस्थित नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. याबाबत म्हात्रे म्हणाले, नागरिकांना नोटीसा आल्याने भयभीत झाले होते. आपले घर तुटले तर आपले कुटुंब रस्त्यावर येईल या चिंतेत होते. मात्र शिंदे सरकारने आपल्या घरांवर हतोडा पडणार नाही असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी सरकारचे आभार मानले.