मीरा-भाईंदरच्या ओस्तवाल बिल्डरला अखेर अटक; अनधिकृत बांधकाम व फसवणुकीचे १३ गुन्हे दाखल

मीरा-भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करून, खोटी कागदपत्रे बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ओस्तवाल बिल्डर्सचा प्रमुख उमरावसिंह पृथ्वीराज ओस्तवाल अखेर कायद्याच्या चौकटीत आला आहे. मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ ने शनिवारी रात्री त्याला बेड्या ठोकल्या.
मीरा-भाईंदरच्या ओस्तवाल बिल्डरला अखेर अटक; अनधिकृत बांधकाम व फसवणुकीचे १३ गुन्हे दाखल
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करून, खोटी कागदपत्रे बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ओस्तवाल बिल्डर्सचा प्रमुख उमरावसिंह पृथ्वीराज ओस्तवाल अखेर कायद्याच्या चौकटीत आला आहे. मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ ने शनिवारी रात्री त्याला बेड्या ठोकल्या. भाजपमध्ये असलेल्या ओस्तवालला आतापर्यंत राजकीय पाठबळासह पोलीस आणि महापालिकेचा वरदहस्त मिळाल्याने तो मोकाट होता.

भाईंदर ते काशिमीरा मुख्य रस्त्यालगतच्या मौजे भाईंदर व गोडदेव गावातील जमिनीवर १०,५२१ चौ. मी. क्षेत्रफळात २००५ साली ‘ओस्तवाल पॅराडाईज कॉम्प्लेक्स’ उभारण्यात आला. २००८ मध्ये सोसायटी स्थापनही झाली. परंतु इमारतींना फक्त चार मजल्यांची परवानगी असतानाही विकासकाने तळमजल्यासह सात मजले वाढवून अनधिकृत बांधकाम केले. तरीही बनावट बांधकाम परवानग्या व नकाशे तयार करून सदनिकांची विक्री करण्यात आली. नव्या यूडीसीपीआर कायद्याने मिळालेल्या अतिरिक्त एफएसआयचा गैरवापर करून इमारत क्र. ९ बांधण्याच्या नावाखाली उर्वरित इमारतींचे हक्क बळकावून कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन रंजीत झा यांनी २०१९ पासून सतत तक्रारी दाखल केल्या होत्या. ओस्तवालच्या अटकेनंतर मीरा-भाईंदर परिसरात नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असतानाच, भाजप कार्यकर्ते मात्र नयानगर व मीरारोड पोलीस ठाण्यात पोहोचल्याचेही समजते.

अधिक प्रकरणे फसवणूक व बनावट कागदपत्रांचे

गुन्हे शाखेने शनिवारी रात्री भाईंदरमधील राहत्या घरातून उमरावसिंह ओस्तवालला अटक केली. त्याचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. ओस्तवालवर नवघर, काशिमीरा, नयानगर व मीरारोड पोलीस ठाण्यांत मिळून १३ गुन्हे नोंदवलेले आहेत. यातील सातपेक्षा अधिक प्रकरणे फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित आहेत.

राजकीय व प्रशासकीय वरदहस्त

ओस्तवालविरोधात विधिमंडळात लक्षवेधीद्वारे आवाज उठवला गेला होता; मात्र ठोस कारवाई झाली नव्हती. शेकडो लोकांची फसवणूक करून सदनिका व दुकाने विकण्यापासून ते महापालिकेचा रस्ता व खेळाचे मैदान अतिक्रमण करून इमारत उभारणे, अशी कृत्ये त्याने केली आहेत. तरीही महापालिका व पोलीस प्रशासनाकडून त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in