पालघर कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी जागा देणार- राजीव पाटील; विरार येथे शेतकरी मेळावा प्रशिक्षण कार्यक्रम

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना माजी महापौर राजीव पाटील यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील
पालघर कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी जागा देणार- राजीव पाटील; विरार येथे शेतकरी मेळावा प्रशिक्षण कार्यक्रम

वसई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. विरार येथील जीवदानी मंदिर संस्थानच्या सभागृहात गुरुवारी शेतकरी मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात नारळ, खजूर, केळी, हळद, बांबूंच्या विविध वस्तू, शेती अवजारे, विविध कंदमुळे, विविध प्रकारचे पशु, आदींचा समावेश या कृषी प्रदर्शनास करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना माजी महापौर राजीव पाटील यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतीशास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी आता नवीन प्रयोग करून शेती उत्पन्न वाढवावे असे सांगून पालघर जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्र उभारण्यासाठी आपण जागेची उपलब्धता करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी हा हेतू ठेवून अशा शेतकरी मेळाव्याची आयोजन करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती भाजीपाला व फळबाग शेतीचे व्यवस्थापन साठवणुकीचे आधुनिक तंत्रज्ञान, पशुसंवर्धन योजना माहिती अशा कृषी क्षेत्राशी निगडित अनेक बाबींचा या शेतकरी मेळाव्यात सहभाग असून शेतकरी बांधवांनी विविध शेती विचारवंतांची मार्गदर्शन घेऊन आपली शेती उत्तम दर्जाची करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार सुनील भुसारा, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आमदार निरंजन डावखरे, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, पंचायत समिती सभापती अशोक पाटील, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, कोकण कृषी विद्यापीठाची पदाधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आजी माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य यांची उपस्थिती होती. यावेळी पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शेती साहित्य मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in