उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाबरोबर युतीत असलेले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे रविवारी रात्री माजी आमदार पप्पू कलानी याच्याबरोबर गाडीत बसून गुप्त ठिकाणी बैठकीला निघून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२७ फेब्रुवारी १९९०ला विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदानावरून भाजप नेते घनश्याम बठीजा आणि पप्पू कालानी यांच्यात बोलाचाली झाली होती. या वादातुनच त्याच दिवशी सांयकाळी घनश्याम बठीजा हे पिंटो पार्क येथे बाहेर उभे असताना झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. हा खुन पप्पू कालानी यानी केल्याची फिर्याद घनश्याम यांचे भाऊ इंदर बठीजा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली होती. तसेच पोलीस सरंक्षणाची मागणीही केली होती; मात्र पोलीस सरंक्षण असून सुध्दा २८ एप्रिल १९९० साली इंदर हे पिंटो पार्कमध्ये असताना बाबा गॅब्रियल, बच्ची पांडे, श्याम किशोर गरीकापट्टी, हर्षद आणि रिचर्ड यानी इंदर यांची निघृण हत्या केली होती.
या दोन्ही प्रकरणाचे प्रमुख सुत्रधार म्हणुन पप्पू कालानी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. इंदर बठीजा हत्या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने ३ डिसेंबर २०१३ रोजी पप्पू कालानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मार्च २०२० पासून देशात कोविड महामारी जाहीर झाल्यानंतर कैद्यांना कोविड आकस्मिक अभिवाचन रजा देण्यात आली होती. तेव्हा बाहेर आलेले पप्पू कलानी हे आजही तुरुंगाबाहेर आहेत. कलानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, मारुती जाधव हत्या प्रकरणाची केस न्याय प्रविष्ट आहे.
मागील अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना खासदार श्रीकांत शिंदे आणि उल्हासनगरची राष्ट्रवादी काँग्रेस सांभाळणारे कलानी कुटुंब त्यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. हे संबंध शिवसेना फुटीनंतरही खासदार श्रीकांत शिंदे यांनी कायम ठेवले आहेत; मात्र श्रीकांत शिंदे हे नेहमी पप्पू कलानी यांच्यापासून दोन हात ठेवून लांब होते. शिंदे यांच्याबरोबर ओमी कलानी किंवा त्यांचा निकटवर्ती असलेला कमलेश निकम हा संवाद साधत होता; मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती असल्याची भीती मनात बाळगत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरणारे श्रीकांत शिंदे हे कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी उल्हासनगर शहरात राजकीय वरदहस्त असलेल्या पप्पू कलानी बरोबर गाडीतून प्रवास करत गुप्त बैठक घडवून आणल्याची चर्चा शहरात रंगली आहे.