ठाणे : शनिवारी अनंत चतुर्थीला गणेशमूर्ती विसर्जित झाल्यानंतर लगेचच रविवारपासून पितृपक्ष सुरू झाल्याने पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध विधी उरकण्यास सुरुवात झाली. या पितृश्राद्धासाठी महिनाभर आधीच ब्राह्मणांकडे नंबर लावण्यास सुरुवात होते. मात्र तरीही दिवसभर श्राद्ध विधी पार पाडणारे ब्राह्मण आधीच बुक झाले आहेत. त्यामुळे यंदा श्राद्ध विधीसाठी ब्राह्मण मिळणे अशक्य झाले आहे. मात्र पितरांच्या श्राद्धासाठी यंदा कावळ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिराच्या मागील बाजूस दशक्रिया-उत्तर कार्य, पूजा, वास्तुशांती, पंचांग, पत्रिका पाहण्यासाठी ब्राह्मण मंडळी उपलब्ध असतात. दिवसभरात शेकडो दशक्रिया विधी येथे पार पडत असतात. पितृपक्षात वडिलांच्या बाजूच्या तीन पिढ्यांची पूर्वजांचे आणि आईच्या बाजूच्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांचे तर्पण आणि श्राद्धकर्म केले जाते. यांनाच आपण पितर म्हणतो. त्यामुळे पितर श्राद्धासाठी येथे नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. सध्या पितृपक्ष सुरू झाला असून भरणी श्राद्ध, महालय श्राद्ध, अयोनवमी, दशमी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या श्राद्ध असे विधी केले जातात.
या विधीसाठी १५ दिवस ब्राह्मण मंडळी श्राद्ध विधीमध्ये बिझी झालेले दिसत आहेत. पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत घरोघरी फिरून हे विधी उरकताना दिसत आहेत. या विधीसाठी ३ हजार रुपयांपासून १० हजारांपर्यंत दक्षिणा घेत आहेत. ब्राह्मण हा विधी अर्ध्या तासात पार पाडतात. दिवसभरात एक ब्राह्मण १५ ते २० ठिकाणी विधी पार पाडत असल्याने सध्या ब्राम्हण नॉट रिचेबल झाले आहेत.
ऑनलाइन पिंडदान करण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे काही लोक त्यांच्या कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पोहोचू शकत नाहीत. अशावेळी परदेशात किंवा आपल्या घरापासून लांब असलेल्या नोकरदार ऑनलाइन बुकिंग करून ब्राह्मणाच्या हस्ते पिंडदानाचे विधी उरकून घेत आहेत. नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन, इस्कॉन, गया येथे ऑनलाइन पिंडदान सुविधा सुरू करण्यात आली आहे, तर मुंबईमध्येही भुलेश्वर घाट, नाशिक पंचवटी येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विधी करण्याची सोय करण्यात येत आहे.