

भिवंडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे ‘आरएसएस’ या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात ‘आरएसएस’ संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात संघटनेची बदनामी झाल्याबद्दल ‘भा.दं.सं.’ कलम ५०० अन्वये खाजगी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली आहे.
या प्रकरणात राजेश कुंटे यांची उलटतपासणी झालेली आहे. तर या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस अधिकारी सायकर यांची सरतपासणी नोंदविलेली आहे, असे शेवटी ॲड. नारायण अय्यर यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे भिवंडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे. यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन होणार का, याकडेही राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.