कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरण : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

१८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा जणांची ठाणे जिल्हा न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.
कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरण : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरण : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता(संग्रहित छायाचित्र)
Published on

ठाणे : १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा जणांची ठाणे जिल्हा न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायिक दंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी हा निकाल दिला.

२००८ मध्ये रेल्वे भरती परीक्षेदरम्यान कल्याण रेल्वे स्थानक परिसरात परराज्यातून आलेल्या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या वेळी मनसेकडून परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली जात होती. तसेच रेल्वे भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोपही मनसेने केला होता. या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेनंतर राज ठाकरे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील दोन आरोपींचे दरम्यानच्या काळात निधन झाल्याने उर्वरित सहा जणांविरोधात सुनावणी सुरू होती. सुरुवातीला कल्याण न्यायालयात चालणारे हे प्रकरण नंतर ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरण : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
शिवसेना चिन्ह वादाची सुनावणी : नेत्यांनी जबाबदारीने बोलावे, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा दावा केला. तसेच आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. बचाव पक्षाचे वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सह्याजी शिंदे यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुरावे अपुरे असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

खटल्यादरम्यान बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला होता की, २००८ मध्ये कल्याण येथे रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षार्थींवर झालेल्या कथित हल्ल्याच्या ठिकाणी राज ठाकरे उपस्थित होते, हे दोषारोपपत्रातून किंवा तोंडी पुराव्यांवरून सिद्ध होत नाही. तसेच मनसे प्रमुखांनी कथित चिथावणीखोर भाषणे केल्याचा कोणताही पुरावा सादर करण्यात फिर्यादी पक्ष (प्रॉसिक्युशन) अपयशी ठरल्याचा युक्तिवादही करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in