
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली वाढत आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्षांना देखील पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील शहराध्यक्ष ते उपशाखा अध्यक्षपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याद्वारे निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देत मतदार याद्यांवर लक्ष देण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली.
२०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच यंदा ठाण्यात चार सदस्यांचे ३२, तर तीन सदस्यांचा एक असे एकूण ३३ प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. यामधून १३१ नगरसेवक निवडून येणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी ठाण्यातील निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कसे काम केले पाहिजे, मतदार याद्यांवर कसे बारीक लक्ष दिले पाहिजे, तसेच सोशल मीडियाचा वापर पक्षाची पोहचविण्यासाठी कसा केला पाहिजे, याविषयी राज ठाकरे यांनी ध्येयधोरण पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.
मतदार याद्यांवर बारीक लक्ष द्या
मतचोरीबाबत आता बोलले जात आहे. परंतु आपला पक्ष आधीपासूनच हे बोलत आहे. २०१४ नंतर आपल्या निवडणुकीत अपयश आले. कारण, मतदार यादीत घोटाळे करून ते निवडणुका जिंकत आहेत. त्यामुळे मतदार याद्यांवर बारिक लक्ष दिले तर आपल्या पक्षाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास राज ठकारे यांनी कार्यकर्त्यापुढे व्यक्त केला.