
ठाणे : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनासाठी एसटी महामंडळाची ‘लालपरी’ पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेला जोडून सुट्ट्या आल्याने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, ठाणे एसटी विभागाने नियमित गाड्यांव्यतिरिक्त ९१ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. हे नियोजन शुक्रवार, ८ ऑगस्ट ते रविवार, १० ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी करण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या अनुभवावरून, यंदाही लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या काळात ठाणे विभागाने नियमित वेळापत्रकापेक्षा ३९ हजार किलोमीटर अधिक बस चालवून १९ लाख ३१ हजार रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळवले होते. यंदा हा आकडा आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, तीन दिवसांत ४५ हजार किलोमीटर जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. एकही गाडी किंवा फेरी रद्द होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. तसेच, ज्या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, तिथे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि वाहतुकीचे सुरळीत नियोजन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
या विशेष नियोजनामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
अशा सुटणार जादा गाड्या :
ठाणे १ आगार: स्वारगेट (०४), बोरिवली (०४), भाईंदर (०३), कराड (०३), कोल्हापूर (०१)
ठाणे २ (खोपट) आगार: स्वारगेट (०२), बोरिवली (०२), नालासोपारा (०२), पनवेल (०३), भिवंडी (०४), कराड (०१), कोल्हापूर (०१)
भिवंडी आगार: ठाणे (०४), बोरिवली (०२), कल्याण (०४), नगर (०२)
शहापूर आगार: कसारा-नाशिक (०३), शहापूर-ठाणे (०२), शहापूर-कल्याण (०२), शहापूर-किन्हवली (०३)
कल्याण आगार: नगर (०३), आळेफाटा (०३), मुरबाड (०४), भिवंडी (०३)
मुरबाड आगार: कल्याण (०३), नगर (०१), आळेफाटा (०३)
विठ्ठलवाडी आगार: भिवंडी (०३), पनवेल (०३), जव्हार (०३), आळेफाटा (०१)
वाडा आगार: ठाणे (०३), पुणे (०२), कल्याण (०३)