ऋषी वाल्मिकीमुळेच रामाचे महत्व, राम बहुजनांचेच; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यात वक्तव्य

जितेंद्र आव्हाड यांनी खारटन येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी यांची आरती केली.
ऋषी वाल्मिकीमुळेच रामाचे महत्व, राम बहुजनांचेच; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यात वक्तव्य

ठाणे : “प्रभू श्रीरामाची आठवण काढल्यावर ऋषी वाल्मिकींना विसरताच येणार नाही. ऋषी वाल्मिकी यांच्यामुळेच रामाची ओळख आहे. त्यांची आठवण काढणं क्रमप्राप्त आहे. जिथे राम आहे तिथे वाल्मिकी आहेत. प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आहेत. असे वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी खारटन येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी यांची आरती केली. तसंच प्रभू रामाचीही आरती केली. त्यानंतर राम हे बहुजनांचेच आहेत. त्यांची ओळख ऋषी वाल्मिकींमुळे आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी हिंदू धर्म वाढवला त्या शंकराचार्यांनी नेमलेल्या चार पीठांचा काय आदर अयोध्येत ठेवला गेला हे आपण पाहिलं, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

आपल्या भाषणात आव्हाड म्हणाले, राम हे बहुजनांचेच आहेत. मी माझ्या शब्दांत बदल करणार नाही. कारण श्रीराम क्षत्रिय आहेत. ते बहुजनांमध्येच येतात. राम वाल्मिकी समाजाचे आहेत. ऋषीतुल्य वाल्मिकींनी श्रीराम घडवले. त्यामुळे श्रीराम सगळ्यांचे आहेत. क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाहीत हे उघडपणे कुणीही सांगावं आम्हाला मग आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन. आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्म वाढवला, रुजवला, पसरवला. त्यांनीच चार पीठं निर्माण केली. लोप पावलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. त्या आदी शंकराचार्यांचे उत्तराधिकारी चार पीठांचे चार शंकराचार्य आहेत. त्यांचा काय सन्मान ठेवला गेला असा टोला आव्हाड यांनी लगावला.

प्रभू राम कुणा एकाचे नाहीत

सगळ्या समाजबांधवांना प्रभू रामाने एकत्र केलं. आदिवासी शबरीची बोरं खाणारे श्रीराम, रावणाचा वध करून बिभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम, वालीचा वध करून सुग्रीवाला सिंहासन देणारे राम अशा विविध सगळ्या समाजाला एकत्र करणारे राम हे खरं रामराज्य आहे. यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करू इच्छितो. वाल्मिकी समाजाचे लोक एकत्र आले आहेत. मी कायमच म्हणतो की प्रभू राम कुणा एकाचे नाहीत ते सगळ्यांचे नाहीत. ही भावना ठेवून पूजा केली, तर रामालाही वाटेल की, रामराज्य आले, असे आव्हाड यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in