कल्याण : १ एप्रिल २०२३ ला लागू असणारा वीज कर्मचारी नवीन वेतन वाढ करार मध्यवर्ती निवडणुका जाहीर होण्यापूर्वी लागू करा, असे आवाहन कामगार नेते भाई जगताप यांनी वीज प्रशासन व राज्य सरकारला केले आहे.
नवीन पगार वाढ करार व वीज क्षेत्राचे खासगीकरण आणि अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाई जगताप यांच्या इंटक फेडरेशनसह राज्यातील ७० हजार वीज कर्मचारी संख्या असणाऱ्या वीजकर्मचाऱ्यांच्या विविध २२ कामगार संघटनांनी एकत्र येऊन, वीज क्षेत्र बचाव संयुक्त कृती समिती तयार केलेली आहे. या कृती समितीने नवीन पगारवाढ करारासाठी तगादा लावल्यानंतर २९ नोव्हेंबर २०२३ रोजी वीज प्रशासन व कर्मचारी कृती समिती यांच्यात बैठक झाली. यावेळी पगारवाढ करार करणे सोयीचे व्हावे म्हणून एक ॲपेएक्स समिती गठीत करून या समितीच्या मदतीने पगारवाढ करार निकाली काढण्याचे ठरले होते; मात्र आजपर्यंत प्रशासनाच्या बाजूने याबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून कृती समितीने १ जानेवारी २०२४ रोजी, २२ कामगार संघटनेच्या सहीने वीज प्रशासन व महाराष्ट्र शासन यांना पत्र लिहून या विषयाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली आहे. २०२४ हे निवडणूक वर्षे असल्याने, त्याची रणधुमाळी सुरू होण्या आधीच हा प्रश्न निकाली निघण्याच्या दृष्टीने तात्काळ बैठका सुरू करण्याची मागणी केली आहे.