विजेच्या खांबाने घेतला रिक्षाचालकाचा बळी

अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर रुंदीकरणानंतरही रस्त्यात असलेले विजेचे खांब हटविण्यात आलेले नाहीत.
विजेच्या खांबाने घेतला रिक्षाचालकाचा बळी
Published on

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर रुंदीकरणानंतरही रस्त्यात असलेले विजेचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. अशाच एका खांबाला रिक्षा धडकून झालेल्या अपघातात मोहम्मद अरिफ सुलेमान शेख या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

सुमारे आठवड्याभरापूर्वी रिक्षा चालक मोहम्मद अरिफ सुलेमान शेख त्यांची रिक्षा घेऊन रात्री घरी जात असताना अचानक समोर विजेचा खांब आल्याने ते त्या खांबाला धडकले व गंभीर जखमी झाले. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर उल्हासनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी मोहम्मद शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मागील पाच वर्षांपूर्वी या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि स्थानिक पालिकांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर विजेचे खांब तसेच आहेत. त्यामुळे हे विजेचे खांब अपघतांचे सापळे ठरत आहेत. हे विजेचे खांब हटवण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्याकडे ही स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने एका रिक्षाचालकाला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून रिक्षा संघटनेने रस्त्यातील विजेचे खांब हटवण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेला पत्र दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in