

ठाणे/नवी मुंबई : नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याच्या आरोपावरून महायुतीतच नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत, ‘नवी मुंबईत भाजप नाही, तर ‘नाईक जनता पार्टी' चालते, अशी टीका केली.
म्हस्के म्हणाले की, नवी मुंबईत ‘हम करे सो कायदा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘ते पक्षालाही मानत नाहीत, नेतृत्वालाही मानत नाहीत. त्यांचा इतिहासही तसाच राहिला आहे. मंदा म्हात्रे यांनाही त्यांनी कधी मान दिला नाही. पक्षसंघटनेपेक्षा स्वतःचा निर्णय अंतिम मानण्याची त्यांची पद्धत आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
निमंत्रण पत्रिकेतील वादावर म्हस्के यांनी दावा केला की, कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या कच्च्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव समाविष्ट होते. मात्र नंतर ते जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आले.
‘मी स्वतः आयुक्तांशी चर्चा केली. कच्च्या पत्रिकेत शिंदे साहेबांचे नाव होते. मात्र महापौर आणि गणेश नाईक यांनी मिळून ते वगळले. हे केवळ राजकारण असून मित्रपक्षाचा अपमान आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
‘कॅथलॅब, डायलिसिस सेंटरसारख्या अनेक महत्त्वाच्या सुविधा उभारण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या योजना प्रत्यक्षात आल्या. आचारसंहितेमुळे उद्घाटन लांबले म्हणून आता इतरांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले.
शिंदे जनतेच्या मनात
एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी ते नाव पुसू शकणार नाही,’ असे म्हस्के यांनी ठामपणे सांगितले.