शहाड उड्डाणपुलावर ‘दुहेरी उद्घाटन’चा तमाशा, भाजप आणि शिवसेना/टीओकेमध्ये श्रेयवादाचे नवे रणांगण पेटले

पायाभूत सुविधेचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय कोणाला मिळणार यावरून भाजप आणि शिवसेना/टीओके गटातील जुने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
शहाड उड्डाणपूल
शहाड उड्डाणपूल
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर-कल्याण परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शहाड उड्डाणपूल अखेर पूर्णत्वास आला असला तरी त्याच्या एकाच दिवशी दोन वेळा झालेल्या उद्घाटनामुळे निर्माण झालेल्या राजकीय कोंडीची सुटका होताना दिसत नाही. पुलाचा वापर जनता करणार यापेक्षा उद्घाटन कोण करणार? यावरून तीन पक्षांमध्ये अक्षरशः ‘रोमहर्षक राजकारण’ रंगले आहे.

वाहतूक दळणवळणासाठी अत्यावश्यक असलेला हा पूल अखेर कार्यान्वित झाला असला तरी श्रेयवादाचा ज्वलंत मुद्दा मध्यभागी आला आहे. पायाभूत सुविधेचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय कोणाला मिळणार यावरून भाजप आणि शिवसेना/टीओके गटातील जुने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

शहाड उड्डाणपुलाचे अधिकृत उद्घाटन सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी करण्याची योजना आधीच जाहीर करण्यात आली होती. मात्र भाजपने अचानक रविवारी दुपारीच कार्यक्रम जाहीर करून फित कापत उद्घाटनाचा सोहळा उरकला. काही तासांतच शिवसेना/टीओके गटानेही आपले स्वतंत्र उद्घाटन करून प्रतिउद्घाटनाचा ‘शो’ केला. एकाच पुलाचे एका दिवसात दोनवेळा उद्घाटन झाल्याने नागरिकांमध्ये नेमका अधिकृत सोहळा कोणता? याबाबत संभ्रम निर्माण झाला.

शहाड उड्डाणपुलामुळे वाहतुकीला दिलासा मिळणार हे निश्चित असले तरी सध्या पुलावर प्रत्यक्ष वाहतूक कमी आणि श्रेयवादासाठीची राजकीय वाहतूककोंडी अधिक दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पावरून राजकीय तापमान किती वाढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

श्रेयवादाचे राजकारण की विकासाचा सोहळा?

या पुलाच्या बांधकामासाठी अनेक तांत्रिक अडथळे पार करावे लागले तसेच कामाला अनेक वेळा विलंबही झाला. मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतर जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ऐवजी राजकीय श्रेय मिळवण्यासाठीच पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली दिसत आहे. तिसरे उद्घाटन आज (सोमवारी) आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते या सर्व गदारोळानंतर आज (सोमवारी) सकाळी अजून एक अधिकृत उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी सकाळी पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे राजकीय वातावरणात आणखी धुरळा उडणार हे निश्चित.

आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवल्याचे कळताच भाजपने घाईघाईत उद्घाटन केले. हा प्रकार जनतेची दिशाभूल करणारा आहे. श्रेय मिळवण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवर जाईल हे यातून दिसते.

- राजेंद्र चौधरी,

नेते शिंदे गट

logo
marathi.freepressjournal.in