

शहापूर : शहापूर ते खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ A चे काम गेल्या आठ वर्षांपासून कासव गतीने सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. या रखडलेल्या कामामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशाच निष्काळजीपणामुळे शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. नाशिक येथील अहिरे कुटुंब प्रवासादरम्यान अपघातग्रस्त झाले, मात्र दैव बलवत्तर ठरल्याने दांपत्य सुखरूप बचावले.
नाशिक येथील गुलाबराव अहिरे, त्यांची पत्नी प्रणिता अहिरे, मुलगा अर्थव आणि क्षितिजा अहिरे हे कारने रत्नागिरीकडे प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी शहापूर तालुक्यातील लेनाडी नदीवरील पुलाजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने, तसेच महामार्गावर कोणतेही इशारा फलक नसल्याने त्यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि कार थेट नदीपात्रात कोसळली.
अपघातानंतर शेंद्रण बुद्रुक गावातील पोलीस पाटील शिवाजी पाटोळे आणि गावातील सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून नदीपात्रात उतरून दांपत्याला सुरक्षित बाहेर काढले. जखमींना शेंद्रण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक उपचार देण्यात आले. या अपघातानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, आठ वर्षांपासून सुरू असलेले हे महामार्गाचे कासवगतीने सुरू असलेले काम अखेर कधी पूर्ण होणार? आणखी किती लोकांना आपला जीव गमवावा लागणार? असा यक्षप्रश्न विचारला जात आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून ठोस भूमिका घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.