ठाणे : धोकादायक ठरलेल्या शाहू मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे महापालिकेच्या महासभेत चांगलाच गाजला. जागेच्या मालकीपासून ते बायोमेट्रिक सर्वेक्षणापर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाजपसह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. मूळ गाळेधारकांना डावलून पोटभाडेकरूंना लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सभागृहात करण्यात आला.
शाहू मार्केटची धोकादायक इमारत पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल व सार्वजनिक पार्किंग उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून, त्यासाठी गाळेधारकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान तब्बल ३५ गाळ्यांचे महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता हस्तांतरण झाल्याचे समोर आल्याने हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी रस्ता रुंदीकरणासाठी गाळे गमावलेल्या जुन्या ठाणेकरांना न्याय देण्याची मागणी केली. विकास रेपाळे यांनी जागेच्या मालकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, महापालिकेची मालकी नसल्यास पुनर्विकासासाठी निविदा कशी काढली, असा सवाल केला.
शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी पात्र गाळेधारकांवर अन्याय होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांना एकत्र बोलावून तोडगा काढण्याची सूचना केली. चर्चेदरम्यान सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर हणमंत जगदाळे यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आणि बहुमताने शाहू मार्केट पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
भाजप आक्रमक
भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी जागेच्या मालकीबाबत, इमारतीला आवश्यक परवानग्या नसताना गाळ्यांचे हस्तांतरण कसे झाले, तसेच पोटभाडेकरूंचे बायोमेट्रिक कोणाच्या आदेशाने करण्यात आले, असा सवाल उपस्थित केला. मूळ गाळेधारकांनाच पुनर्वसनाचा अधिकार द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. त्याचवेळी भाजपचेच नगरसेवक संजय वाघुले यांनी सर्व पात्र गाळेधारकांचे बायोमेट्रिक करून पुनर्वसनाचा लाभ द्यावा, अशी भूमिका मांडली.