स्मार्ट मीटर बसवले;मात्र बिलाची रक्कम वाढली

बहुतांशी ग्राहकांना बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवून आली असल्याने स्मार्ट मीटरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले
स्मार्ट मीटर बसवले;मात्र बिलाची रक्कम वाढली

ठाणे महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. तसेच सरसकट समान बिलाची आकारणी करण्यात येत असल्याने हा असमतोल हटवण्यासाठी प्रत्येक कनेक्शनला मीटर बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून पाण्याचे मीटर बसवण्यात येत आहेत. आतापर्यत जवळपास १ लाखाहून अधिक मीटर बसवण्यात आले आहेत. मात्र नव्याने बसवलेल्या मीटरचे रिडींग नोंदवून जी बिले देण्यात आली ती मोठ्या प्रमाणात सदोष असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

बहुतांशी ग्राहकांना बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवून आली असल्याने स्मार्ट मीटरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी तांत्रिक चुकांमुळे बिले वाढली असून त्यात सुधारणा करण्यात येत असल्याचा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

ठाणे पालिका परिसरात तब्बल २१ वर्षानंतर पाण्याचे मीटर बसविण्याचा निर्णय झाला. तीन वर्षांपासून मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र पहिल्याच वर्षी या मीटरच्या माध्यमातून जी बिले काढण्यात आली ती सदोष असल्याचे उघड झाले. याचा परिणाम पाणीपट्टी वसुलीवर झाला झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेच्या पाणी बिलाचे २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट कमी करून १५८ कोटी आणले आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत व्यावसायिक मीटर आणि घरगुती बिल मिळून केवळ १०५ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली झाली आहे. आतापर्यंत पाणीपट्टीच्या वसुलीत काहीशी वाढ झाली असून गेल्यावर्षी याच दिवसात २५ कोटी ५५ लाख वसुली होती तर यंदा ३५ कोटी ९४ लाखाची वसुली झाली आहे.

ठाण्यात १ लाख १३ हजार पाण्याचे अधिकृत मीटर्स असून एक अत्याधुनिक मीटर्स बसवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र तेव्हा तो फेटाळण्यात आला. २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जुन्या सरकारने मंजूर केलेले सर्व प्रकल्प रोखल्यामुळे पाण्याचे मीटर्स बसवण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा रखडला. तो पुन्हा अमृत योजनेच्या माध्यमातून पाठवण्यात आला मात्र तिथेही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अखेर तीन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेतून पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाण्याचे सुरळीत वितरण होऊन, पाण्याचे महत्व समजावे याकरिता पाणी मीटर लावण्याचा निर्णय झाला. जेवढा पाणी वापर तितकेच पाण्याचे बिल भरावे लागणार आहे. मात्र मीटर लावण्यावरून काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

पालिका क्षेत्रात सुमारे २ लाख २३ हजार कनेक्शन असून यापैकी एक लाख १३ हजार ३२८ ग्राहकांना मीटर बसवायचे आहेत.पाण्याचे मीटर बसवण्याचा खर्च स्मार्ट सीट योजनेत ७५ कोटी निर्धारित करण्यात आला होता. मात्र खर्चात वाढ झाली असून मीटर बसवण्यासाठी ९७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पाच वर्षे देखभाल तेसच दुरूस्तीचा खर्च जवळपास २६ कोटी असणार आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक मीटर बसवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in