उल्हासनगर : "मी विषारी सापाच्या दंशाने जीवाच्या आकांतात होतो... पण सरकारी रुग्णालयाच्या दारात तासभर उभा राहूनही कोणीतरी 'डॉक्टर' म्हणावा असा माणूस समोर आला नाही!" हा अनुभव आहे उल्हासनगरातील अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष जवानाचा... ज्याने जीवाची पर्वा न करता साप पकडला आणि नंतर सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या गोंधळात स्वतःचा जीव धोक्यात घातला. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या वेदना नाहीत, तर आपल्या आरोग्य यंत्रणेतील बेपर्वाईचे, जबाबदारीशून्यतेचे आणि मृत्यूपर्यंत नेणाऱ्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले जवान प्रकाश भोसले यांच्यावर नुकताच एक धक्कादायक प्रसंग ओढवला. कर्तव्य बजावताना एका सापाला पकडत असताना त्यांच्या हाताला सापाने दंश केला. साप विषारी असण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी कोणतीही वेळ न दवडता थेट उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय गाठले. मात्र तिथे त्यांना उपचाराऐवजी फक्त उदासीनता, गोंधळ आणि प्रशासनाचा ढिसाळपणा अनुभवास मिळाला.
इमर्जन्सीमध्ये दाखल होताच फक्त नाव-फोन नंबर लिहून घेण्यात आले. प्रकाश भोसले यांनी वारंवार सांगितले की, साप चावला असून त्वरित उपचार गरजेचे आहेत. तरीही त्यांना तब्बल ४५ मिनिटे कोणतीही वैद्यकीय मदत न देता उभे भीती घेऊन आणि व्यवस्थेवर ठेवण्यात आले. एकही डॉक्टर पुढे आला नाही, ना तपासणी, ना इंजेक्शन, ना निदान प्राथमिक औषध ! शेवटी वैतागून, मनात प्रचंड नाराज होऊन त्यांनी उपचार न घेता रुग्णालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी उल्हासनगर महापालिकेचे आरोग्य केंद्र गाठले, त्या ठिकाणी देखील इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांनी स्वखर्चाने इंजेक्शन आणल्यावर त्यांना इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आले.