मध्य वैतरणा धरणातून अचानक पाणी सोडले; एक जण गेला वाहून, मुलीला वाचवण्यात यश

भास्कर पादीर व रुचिका असे दोघे पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने भास्कर पादीर यांनी रुचिकाला खांद्यावर उचलून घेतले परंतु पाण्याचा जोर अधिक वाढल्याने...
मध्य वैतरणा धरणातून अचानक पाणी सोडले;  एक जण गेला वाहून, मुलीला वाचवण्यात यश
Published on

मोखाडा : मध्य वैतरणा धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने बेसावधपणे येथील लोखंडी सांगाड्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या भास्कर नाथा पादीर (४०), रुचिका भाऊ पवार (८) हे दोघेही पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून जात होते. मात्र यामध्ये भास्कर नाथा पादीर हे वाहून गेले असून रुचिकाला वाचवण्यात यश आले आहे. अद्यापही पादीर यांचा तपास लागलेला नाही.

भास्कर पादीर आणि रुचिका पवार हे सावर्डे येथील रहिवासी असून ते कसारा येथून आपल्या घरी सावर्डे येथे परतत असताना शनिवारी ही दुर्घटना घडली आहे. शनिवार संध्याकाळच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानक मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या प्रवाहातून भास्कर पादीर व रुचिका असे दोघे पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने भास्कर पादीर यांनी रुचिकाला खांद्यावर उचलून घेतले परंतु पाण्याचा जोर अधिक वाढल्याने पादीर हे वाहून गेले. अगदी शेवटच्या क्षणी काठावरील माणसांनी रुचिकाला हात देत सावरल्याने रुचिकाला सुखरूप बाहेर काढता आले . मात्र भास्कर यांचा शोध उशीरा पर्यंत चालूच होता.

तीन वर्षांतील ८ वी घटना

मध्य वैतरणा धरणावर असलेल्या पुलावर दापूरे, सावरखुट आदी भागातील नागरिकांची येथून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मागील अनेक वर्षांपासून वाहून जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या ३ वर्षातील ही ८ वी घटना असून ३ वर्षांत मंगळू सक्रू वारे, कल्पना पुनाजी झोले, घनश्याम राम गुंड तर किनिस्ते येथील शिद (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच कसारा येथील एक व्यक्ती आपल्या सासूरवाडीला सावर्डे येथे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले आहेत. अशा ८ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमावले आहे.

logo
marathi.freepressjournal.in