

दानिश आझमी/कल्याण
कल्याण-डोंबिवली परिसरातील दिवा-वसई रेल्वे मार्गिकेवरील मोठागाव-ठाकुर्ली रेल्वे फाटकावरील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश मोरे यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी पालिका प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रस्तावित उड्डाणपुलाला आवश्यक त्या मंजुरी मिळाल्यानंतरही हा प्रकल्प बऱ्याच काळापासून रखडला होता. या प्रकल्पामुळे परिसरातील सततच्या वाहतूककोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांना आणि स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, हा प्रकल्प या भागातील वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
कल्याण-डोंबिवली मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची निविदा आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले की, निविदा प्रक्रियेसाठी अंदाजे ३५.४४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, तर निवडलेल्या कंत्राटदाराला पुढील २४ महिन्यांच्या निश्चित कालावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करावे लागेल. प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार राजेश मोरे यांनी कल्याण-डोंबिवली मनपाचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर निविदा प्रक्रियेला वेग आला.
आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर पालिका प्रशासनाने वेगाने हालचाली करत प्रकल्पाचे काम पुढे नेले. शहर अभियंत्यांच्या कार्यालयात २३ जून रोजी निविदापूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यानंतर अंतिम निविदा मंजुरी आणि त्यानंतरच्या इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील.
वाहतूककोंडी वाढली
डोंबिवलीतून ठाण्याला जाण्यासाठी मोठागाव-ठाकुर्ली मार्गे प्रवाशांना कमी वेळ लागतो. त्यामुळे डोंबिवलीकर या मार्गाचा वापर करत आहे. रेल्वे क्राॅसिंगमुळे या भागात वाहतूककोंडी वाढत आहे. त्यामुळे येथे पुलाची मागणी केली जात होती.