

ठाणे : इयत्ता १२ वी सायन्सच्या परीक्षेत ९५.७ टक्के गुण मिळवणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ठाण्यात घडली.
या तरुणाने अलीकडेच १२ वी सायन्स विषयात ९५.७ टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शिवपूर (कोलकाता) येथे ‘बीएस-एमएस’ या दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा होता. मात्र, ॲप्टीट्यूड टेस्टमध्ये १०,४७४ रँक आल्यामुळे त्याचा प्रवेश हुकला. आवडत्या संस्थेत प्रवेश न मिळाल्यामुळे तो प्रचंड निराश झाला होता.
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट या उच्चभ्रू गृहसंकुलात हा मुलगा व कुटुंबीय राहत होते. ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास सायकल चालवायला जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर रात्री ८.१५ च्या सुमारास त्याने व्हॉट्सॲप ग्रुपवर जीवन संपवत असल्याचे सांगणारा मेसेज पाठवला.
मात्र, कुटुंबातील कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच, ४ सप्टेंबरच्या संध्याकाळी त्याने एका निवासी इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील 'रिफ्युज एरिया'वरून उडी मारून आपले जीवन संपवले होते. तो फूटपाथवर जखमी अवस्थेत आढळला.