
ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणीपुरवठा विभागाने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. पाणी बिल वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७८० नळ जोडण्या खंडित केल्या असून १५२ मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत. तसेच, एकूण ५० पंप रूम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी ३३५४ थकबाकीदार ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ५९.४३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ही योजना ०१ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील.
या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयके जमा केली असतील, अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.
बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त