

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, ७ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ८ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार आहे. या कालावधीत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (एचएसआर) येथे बारावी गुरुत्ववाहिनी क्रमांक १, २ व ३ वर उन्नतीकरण तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या कामांमुळे दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ मधील काही भाग वगळता) तसेच कळवा प्रभाग समितीतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. २, नेहरू नगर, मानपाडा आणि कोलशेत खालचा गाव या भागांमध्येही २४ तास पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केेले आहे.
दरम्यान, यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काळात धरणांतील पाणीसाठ्यावर अधिक ताण येण्याची शक्यता आहे.