ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा तसेच वागळे प्रभाग समितीच्या काही भागांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत पाणीपुरवठा केला जातो. एल निनो आणि आयओडी (इंडियन ओशन डायपोल) यांच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा तसेच वागळे प्रभाग समितीच्या काही भागांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत पाणीपुरवठा केला जातो. एल निनो आणि आयओडी (इंडियन ओशन डायपोल) यांच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जलसंपदा विभागासोबत १४ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीतील निर्णयानुसार एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, ४ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ५ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ मधील काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभागातील कोलशेत खालचा गाव या भागांनाही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करावा, पाण्याची साठवणूक करून ठेवावी आणि पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in