ठाणेकरांनो, रिंग मेट्रो का नको? प्रशासनाचे विरोधकांना प्रत्युत्तरादाखल उत्तर

ठाणे रिंग मेट्रोविरोधातील नागरिकांच्या आंदोलनाची धार वाढत असतानाच प्रशासनानेही आता समाजमाध्यमांवरून थेट प्रतिवाद सुरू केला आहे.
ठाणेकरांनो, रिंग मेट्रो का नको? प्रशासनाचे विरोधकांना प्रत्युत्तरादाखल उत्तर
ठाणेकरांनो, रिंग मेट्रो का नको? प्रशासनाचे विरोधकांना प्रत्युत्तरादाखल उत्तर(Photo - दीपक कुरकुंडे)
Published on

ठाणे/ प्रतिनिधी : ठाणे रिंग मेट्रोविरोधातील नागरिकांच्या आंदोलनाची धार वाढत असतानाच प्रशासनानेही आता समाजमाध्यमांवरून थेट प्रतिवाद सुरू केला आहे. ‘रिंग मेट्रो नको’ म्हणणाऱ्या ठाणेकरांचे आक्षेपच व्हिडीओच्या सुरुवातीला मांडत त्यानंतर ‘का नको?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शहरातील वाहतूककोंडीचे वास्तव समोर ठेवत रिंग मेट्रो ठाण्याच्या भविष्यासाठी का गरजेची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आला आहे.

सुमारे १२,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला ठाण्यातून विरोध होत आहे. प्रकल्पाचा खर्च, पर्यावरण, वाहतूक नियोजन आणि प्रस्तावित मार्गावरून नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. काही दिवसांपासून रिंग मेट्रोविरोधात आंदोलने सुरू असतानाच प्रशासनाने हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून प्रकल्पाच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, त्यानंतर व्हिडीओचा सूर बदलत शहरातील वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी लागणारा वेळ दाखविण्यात आला आहे. त्यावर ‘का... नको?’ असा प्रतिप्रश्न करण्यात आला आहे.

‘आधीची कामे पूर्ण करा...’

सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडीओची सुरुवातच नागरिकांच्या आक्षेपांनी होते. ‘आधीची कामे पूर्ण करा’, ‘१२ हजार कोटींचा खर्च कशाला?’, ‘पर्यावरणाचे काय?’, ‘वाहतूककोंडी आणखी वाढेल’, ‘ठाण्याची वाट लागणार’, ‘अजिबात नको ही मेट्रो!’ असे प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in