
भिवंडी : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प पाच अंतर्गत सुरू असलेल्या ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील काम बहुतांश पूर्णत्वास आले असून या मार्गावरील अंजूरफाटा येथील वसई दिवा रेल्वे मार्गावरील पुलाच्या वरून मेट्रो लाईनचे गर्डर टाकण्यासाठी एक व दोन एप्रिल रोजी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ठाणे-भिवंडी या मार्गावर अंजुर फाटाच्या पुढे भिवंडीत येण्यासाठी सर्वच वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.अशी माहिती नारपोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या दरम्यान वसई दिवा रेल्वे मार्गावरील वाहतूक ही बंद असणार आहे. या मार्गाने सर्व वाहतूक रात्री बंद असताना पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने सुचवले असून मानकोली अंजूरफाटा खारबाव मार्गे अहमदाबाद महामार्गा कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घोडबंदर रोड मार्गे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असणार आहे.
नवी मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना गॅमन जंक्शन कळवा येथे प्रवेश बंदी असून गैमन जंक्शन कळवा येथून खारेगाव टोल नाका वरून घोडबंदर रोड मार्गे गुजरातकडे वाहने जातील.
माजीवडा, मानकोली मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना माजीवाडा वाय जंक्शन येथे प्रवेश बंदी असून पर्याय म्हणून माजीवाडा वाय जंक्शन येथून घोडबंदर रोड ने गुजरातकडे जाण्यासाठी पर्याय सुचवला आहे.
गुजरातकडून चिंचोटी नाका मार्गे अंजूरफाटा मार्गे येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंदी असून त्यांच्यासाठी चिंचोटी नाका, गायमुख फाऊंटन हॉटेल मार्गे घोडबंदर रोडने माजीवाडा जंक्शनने पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असणार आहे.