ठाण्यात बालकांना पळविण्याचा प्रयत्न फसला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित जेरबंद

ठाण्यातील सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत परिसरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित भगवान बेहरा याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ठाण्यात बालकांना पळविण्याचा प्रयत्न फसला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित जेरबंद
Published on

ठाणे : ठाण्यातील सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत परिसरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित भगवान बेहरा याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरकरनगर परिसरातील साईप्रसाद सोसायटी आणि शांतीदूत सोसायटी परिसरात काही लहान मुले गुरुवारी खेळत असताना एका व्यक्तीने दोन ते तीन मुलांना अचानक उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा प्रकार लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली.

संतप्त नागरिकांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला पकडून त्याची चौकशी केली आणि नंतर त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याची ओळख भगवान बेहरा (३३) अशी पटली आहे. तो सध्या परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावर मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in