
ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेने दिवा-शिळ भागातील २१ इमारतींवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार ठाण्यातील नागरिकांनी अनधिकृत इमारतीत कोणत्याही प्रकारे घर घेऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच यानिमित्ताने झालेले व्यवहार देखील बेकायदेशीर असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दिवा-शिळ भागातील २१ अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर आता पुन्हा याच भागातील आणखी ११ इमारतींवर कारवाई महापालिकेने प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली असून आतापर्यंत १६० च्य आसपास अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. याशिवाय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहरातील हरित क्षेत्र - व ना विकास क्षेत्रात सर्व्हे केला - असून त्याठिकाणी तब्बल ६४२६ अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यापुढे जाऊन अनाधिकृत बांधकामांना आळा बसावा, या उद्देशाने महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे.
बेकायदेशीरपणे अनधिकृत बांधकामे करून अशा अनधिकृत बांधकामांची खरेदी, विक्रीचे व्यवहार करतात. हे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. अशा प्रकारची बांधकामे करणे, अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणे, अनधिकृत बांधकामांमध्ये सदनिका खरेदी करून वास्तव्य करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारची फसवणूक होऊ नये, म्हणून नागरिकांनी अशी खरेदी करण्यापूर्वी ती इमारत अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे, याची खातरजमा महापालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे पालिकेतर्फे आवाहन
ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून सविस्तर चौकशी करून बांधकामाच्या अधिकृतेबाबत खातरजमा करावी. ठाणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई करून तोडण्यात येऊ शकते. त्यामुळे अशा इमारतींमध्ये घर घेऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.