
ठाणे : तांत्रिक कारणांमुळे डायघर कचरा प्रकल्प एक महिन्यापासून बंद असल्याने ठाण्यातून एकही कचऱ्याची गाडी डायघर प्रकल्पाकडे जात नाही. परिणामी एका महिन्यापासून संपूर्ण ठाणे शहराचा कचरा हा सीपी तलाव परिसरातच टाकला जात असून या ठिकाणी पुन्हा एकदा कचऱ्याचे अक्षरशः ढीग साचले आहेत. सीपी तलाव परिसराच्या बाहेर कचऱ्याच्या गाड्यांच्या अक्षरशः रांगा लागल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डायघर परिसरात कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी अजूनही पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. जेव्हापासून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे तेव्हापासून काही ना काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येत असते. काही महिन्यांपूर्वीच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकल्प काही दिवस बंद ठेवावा लागला होता. आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या महिनाभरापासून डायघर प्रकल्पाची क्षमता कमी झाल्याने सर्व कचरा हा पुन्हा सीपी टँक परिसरातच साठवला जात आहे. परिणामी या परिसरात अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
डायघर प्रकल्प सध्या बंद असल्याने ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट तसेच खाडीच्या पलीकडे असलेले कळवा, मुंब्रा आणि दिवा असा संपूर्ण ठाणे शहराचा कचरा आता या ठिकाणी आणून टाकला जात आहे. दररोज १५० पेक्षा अधिक कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी खाली होत आहेत. मात्र कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने सीपी टँक परिसराच्या बाहेर अक्षरशः गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे एका गाडीचा नंबर येण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याचे कामगारांनी सांगितले.
स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा होत असलेल्या ठाणे शहराच्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषत: वागळे इस्टेट भागात असलेल्या सीपी टँक भागात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत.
तांत्रिक कारणांमुळे डायघर प्रकल्पाची क्षमता काही प्रमाणात कमी झाली आहे. येत्या चार दिवसांत पुन्हा एकदा कामकाज सुरळीत होणार आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठा.म.पा.