

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांची युती, त्यातील जागावाटप आणि इच्छुकांची मोठी गर्दी यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले, तर काही हौशी उमेदवारांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र आहे.
२०१७ मध्ये ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आली. मात्र कोरोना महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तब्बल चार ते पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे शिंदे गटाची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मनसे तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले.
विशेषतः शिंदेसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र महायुतीतील जागावाटपात कमी-अधिक जागा मिळाल्याने पक्षश्रेष्ठींना सर्व इच्छुकांना न्याय देता आला नाही. अनेक निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या इच्छुकांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. या बंडखोरीला आळा घालण्यासाठी महायुती आणि आघाडीतील नेत्यांनी कंबर कसली असून, बंड शमवण्यात सुमारे ९० टक्के यश
मिळाल्याचा दावा केला जात आहे. तरीही अपक्ष उमेदवारांची समस्या पूर्णतः सुटलेली नाही. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी एकूण १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५५ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारीच्या टप्प्यात उमेदवारी मागे घेतली, तर प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार अंतिम रिंगणात उभे आहेत. त्यामुळे पक्षातील बंडखोरांचे बंड काही अंशी शमले असले, तरी अपक्षांसह बंडखोरीचे आव्हान अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.
या पक्षांच्या उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अर्ज माघारीच्या दिवशी अपक्षांसह काही स्थानिक व छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ७नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. माघार घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.