
ठाणे : दुचाकीवरून घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुलावरून घरी जात असलेल्या आरती सुशील अग्रवाल (२७) या महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने मागून आलेल्या एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आरती अग्रवाल यांना आपले प्राण गमवावे लागले. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
घोडबंदर रोड, ओवळा नाक्यावरील हार्मोनियम सोसायटीत राहणाऱ्या मयत आरती अग्रवाल या ठाण्याहून घोडबंदर रोडने घरी जात होत्या. त्यांची दुचाकी वाघबीळ उड्डाणपुलावर आली असता, पाठीमागून आलेल्या कंटेनरचालक दानिश मलिकचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली.
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.